वसईत सेनेची बॅनरबाजी ‘जस्टीस फॉर अन्वय नाईक’

पोलीसनामा ऑनलाईन : वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी ( Anvay Naik Suicide Case ) रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. गोस्वामी अटकेवरून राज्यातील सेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप आमने- सामने आले आहेत. दोघांकडूनही विविध क्रिया-प्रतिक्रियांना उधाण आले आहे. ही कारवाई आकसापोटी केल्याचा आरोप राज्यातील विरोधकांकडून केला जात आहे, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी करणाऱ्या गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्हीविरोधात पोलिसांनी उचित कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया सोशल मीडिया आणि समाजस्तरावरून उमटतांना दिसत आहेत.

दरम्यान गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर गोस्वामी यांच्यावर कारवाई (sena-aggressive-demanding-action) झालीच पाहिजे, अशी मागणी करत वसई शहर शिवसैनिकांनी वसई पश्‍चिमेतील ओमनगर या येथे ‘जस्टीस फॉर अन्वय नाईक’ अशी बॅनर ( banner-justice-anvay-naik) लावून गोस्वामी यांना झालेल्या अटकेचे समर्थन केले आहे. राज्य शासन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सातत्याने गोस्वामी यांनी आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू केली होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यावर नाना तऱ्हेचे आरोप करण्याचा सपाटाच गोस्वामी यांनी लावला होता. अशात टीआरपी घोटाळ्यात अर्णव गोस्वामी यांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याने अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. अशाताच वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना अटक केली.