या 3 प्रकारच्या दुकानांना ‘नाईट लाईफ’मध्ये परवानगी नाही : नवाब मलिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफ या ड्रिम प्रोजेक्टच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 27 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरु होईल. परंतु राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपचा विरोध आहे. भाजपच्या या विरोधाला हाणून पाडत मंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांनी आधी अभ्यास करावा असा सल्ला भाजप नेत्यांना दिला.

नाईट लाईफ या आदित्य ठाकरेंच्या ड्रिम प्रोजेक्टवर बोलताना अशिष शेलारांनी शंका उपस्थित केल्या. ते म्हणाले की ही नाईट लाईफ नसून किलिंग नाईट आहे. नाईट लाईफच्या आडून भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करत त्यांनी नाईट लाईफ मागे खरे निकष काय असा प्रश्न शिवसेनेला विचारला. यानंतर आता नवाब मलिक यांनी नाईट लाईफबद्दल महत्वाची माहिती दिली.

कामगार मंत्री नवाब मलिक म्हणाले की, मुंबईतील 24/7 नाईट लाईफचा जो प्रस्ताव आहे, त्यात फक्त हॉटेल्स, दुकाने, मॉल्स पूर्णवेळ सुरु ठेवण्याची परवानगी असेल. बार, क्लब आणि मद्याची दुकाने यांना परवानगी नसेल. या निर्णयाने ज्या भागात शिकशुकाट असतो त्या भागात गुन्हेगारीला आळा बसेल. निर्णयामुळे लोकांना सुविधा मिळणार असून मुंबईतील ट्रॅफिकही कमी होईल.

या निर्णयाने रोजगार निर्मिती होणार असून सरकारचा महसूलही वाढीस लागेल. त्यामुळे विरोधकांनी विरोध करण्यापूर्वी प्रस्तावात देण्यात आलेल्या बाबींचा पूर्ण अभ्यास करावा असा टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला.

मुंबईत नाईट लाईफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी घोषणा केली आहे. यात त्यांनी स्पष्ट केले की पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरु राहतील.

फेसबुक पेज लाईक करा –