BCCI कडून कपिल देव यांना नोटीस, रवी शास्त्रींची केली होती निवड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बीसीसीआयने थेट भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनाच नोटीस पाठवली आहे. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट सल्लागार समितीकडून भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची फेरनिवड करण्यात आली होती. या प्रकरणी BCCI ने कपिल देव यांना नोटीस पाठवली आहे.

ज्यावेळी BCCI च्या प्रशिक्षक पदाची निवड प्रक्रिया पार पडली त्यावेळी क्रिकेट सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष पद कपिल देव यांच्याकडे देण्यात आले होते. याच समितीत माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी देखील सहभागी होते.

बीसीसीआयमध्ये कोणताही व्यक्ती एका वेळी फक्त एकच पद भुषवू शकतो. त्यापेक्षा जास्त पदे स्विकारल्यास परस्पर हितसंबंध जपल्याचे म्हणले जाते.

परस्पर हितसंबंध जपल्याचा आरोप
कपिल देव सध्या समालोचन करत आहेत, BCCI शी ते समालोचक म्हणून करारबद्ध आहेत. याशिवाय ‘फ्लडलाइट’ या कंपनीचे ते मालक देखील आहेत. शिवाय ते सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेटरच्या संघटनेचे सदस्य आहेत.

अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी हे दोघे देखील भारतीय क्रिकेटर संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे परस्पर विरोधी हितसंबंध जपल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत. हा आरोप मध्यप्रदेशचे क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी केला आहे. या तिघांना ही आता नोटीस पाठवण्यात आली आहे. याला त्यांना आता उत्तर द्यावे लागणार आहे.

Visit : policenama.com