‘सतर्क राहा, अन्यथा मोघलाई दूर नाही’ : भाजपा खासदार तेजस्वी सूर्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव चर्चेत बोलताना भाजपचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी दिल्लीतील शाहीन बाग येथे सुरू असलेल्या आंदोलनावर टीका केली. शाहीन बाग येथे सीएए विरोधात आंदोलन सुरु आहे. बहुसंख्या समुदायाने सतर्क रहावं, अन्यथा देशात पुन्हा मुघल शासन परतण्याची शक्यता असल्याचे तेजस्वी सूर्या यांनी म्हटले आहे. तेजस्वी सूर्या हे आपल्या तडफदार भाषणांमुळे ओळखले जाणारे तरुण खासदार आहेत.

बहुसंख्य समुदाय सतर्क राहिला नाही तर मुघल राज्य दूर नाही असे तेजस्वी सूर्या यांनी म्हणत शाहीन बाग आंदोलनावर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात जोरदार गदारोळ झाला. मागील कित्येक दशकापासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवल्याबद्दल तेजस्वी सूर्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

तेजस्वी सुर्या आपल्या भाषणात म्हणाले, जुन्या जखमा भरून काढल्या शिवाय न्यू इंडियाची निर्मिती होणार नाही. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील पीडितांना नागरिकत्व देण्यासाठी सीएए आहे. या कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. भारतीयांशी सीएएचं काहीही देणंघेणं नाही हे विरोधकांनाही माहित आहे. पण हे जाणिवपूर्वक केले जात आहे. हे दुर्दैवी आहे.

तेजस्वी सूर्य़ांचा विरोधकांवर हल्लाबोल
तेजस्वी सूर्य़ा यांनी आपल्या भाषणात सिएए कायद्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, शेजारीच्या मुस्लीम बहुसंख्य देशात धार्मिक अत्याचाराला बळी ठरलेल्या लोकांना सीएएमुळे नागरिकत्व मिळेल. पण याला विरोध केला जात आहे. विरोधकांना मुद्दे संपवू द्यायचे नाहीत. जेणेकरून ते वोट बँकेसाठी वापरता येतील, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.