पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दररोज व्यवसाय, धंदा आणि कार्यालयामध्ये तसेच, लग्नसमारंभ, सणवार, दररोज आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसावे यासाठी प्रत्येकजण काळजी घेतो. त्यामध्ये (महिला आणि पुरुष) अलीकडे ब्यूटीपार्लर या गोंडस नावाच्या व्यवसायाला चांगले दिवस आले होते. यावर्षी लग्नसमारंभसुद्धा अवघ्या पाच-दहा मंडळींमध्ये उरकू लागली आहेत. त्यामुळे मांगल्याच्या व्यवसायामध्ये पार्लरसह अनेक व्यवसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पार्लर व्यवसायिकांना शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शिवसेना शिव आंगणवाडी जिल्हा संघटिका अमृत पठारे यांनी केली आहे.
अमृत पठारे म्हणाल्या की, कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आणि 22 मार्च रोजी देशभर लॉकडाऊन झाले. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता आणली. मात्र, त्यामध्ये सलून आणि ब्यटीपार्लर वगळले. त्यामुळे पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अलिकडे शहरी राहणीमानाचा परिणाम ग्रामीण भागातही होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये महिला-मुलींचा मेकअपही लपून राहिला नाही. शहर, उपनगर आणि मोठ्या खेड्यातही घरगुती तसेच मोठ्या स्वरूपातील ब्युटीपार्लरची शॉप सुरू झाली आहेत. त्यासाठीचे देणाऱ्या शासकीय तसेच निमशासकीय संस्थांनी प्रसिक्षण सुरू केले आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या संकटाने हा व्यवसाय थांबविण्यास भाग पाडले. त्यामुळे अनेक महिला-मुलींचे व्यवसाय बंद पडले आहेत. या व्यवसायावर अनेक गृहिणी कुटुंबाचा भार पेलवत होत्या. त्यांना अर्थाजर्नाचे दुसरे साधन नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे शासनाने त्यांना विशेष मदत करण्याची गरज आहे, असेही त्यांनी ,सांगितले.
दरम्यान, रामटेकडी येथील सलून व्यावसायिक आशिष गायकवाड म्हणाले की, कालौघात सलून व्यावसायिकांनीही पांरपरिक व्यवसायाचे रुपडं पालटून आधुनिकता आणली आहे. शहर आणि उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणावर सलून व्यावसायिकांनी वातानुकूलित आणि झटपट सेवा देण्याचा मार्ग चोखाळला आहे. कुठल्याही व्यवसायामध्ये नम्रता आणि तत्परता अत्यंत महत्त्वाची असते, त्याप्रमाणे सलून व्यवसायिकांनी स्वतःमध्ये मोठा बदल करून घेतल्याचे दिसत आहे. मात्र, कोरोना व्हायरसचे संकट देशावर नव्हे तर जगावर कोसळले आणि जीवनमरणाची लढाई सुरू झाली आहे. दरम्यानच्या काळामध्ये अनेक उद्योग-व्यवसाय आणि कंपन्या, दुकाने, स्वीट होम सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कारागिरांना मदत देण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.