‘कोरोना’मुळं आता मंत्रालयातील कामकाज चालणार WhatsApp आणि SMS च्या मध्यमातून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच कामांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अनेक शासकिय नियमांमध्ये बदल होत आहेत. सगळ्या कामाच्या कामकाजाची दिशा बदलून गेली आहे. महाराष्ट्राचं कामकाज चालतं ते मंत्रालयातून मात्र मुंबईत कोरोनाचा प्रकोप असल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांना आता घरूनच कामकाज करण्यास सांगण्यात आलं आहे. यामुळे शासकिय ई-मेल सोबतच व्हॉट्सअ‍ॅप आणि एसएमएसच्या माध्यमातून कामकाजाची परवानगी देण्यात आली आहे. शासनाने याबाबतचा आदेश काढला असून याची माहिती सर्व विभागांना कळवण्यात आली आहे.

गर्दी कमी करणे आणि व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी घरातूनच कामकाज करण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. एवढे दिवस ई-मेल शिवाय व्हॉट्सअ‍ॅप आणि एसएमएस च्या माध्यमातून माहितीची आदान प्रदान होत असली तरी ते अधिकृत मानलं जात नव्हतं. परंतु आता परिस्थिती बदलली असून सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्याला मान्यता देण्यात आली आहे. अधिकारी आता घरी बसून प्रस्ताव तयार करणं आणि ते वरिष्ठांना मान्यतेसाठी पाठवणं हे काम व्हॉट्सअ‍ॅप आणि एसएमएसच्या माध्यमातूनही करू शकतात.

शासकिय ई-मेलद्वारे प्रस्ताव पाठवल्यावर त्याची माहिती संबंधितांना व्हॉट्सअ‍ॅप आणि एसएमएसच्या माध्यमातून कळवावी असंही सांगण्यात आलं आहे. यासंबंधात सरकारी आदेश निघाल्याने कर्मचाऱ्यांना काहींसा दिलासा मिळणार आहे. तसेच कामकाजाला वेग येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शासनाने काढलेल्या आदेशात, शासकिय कर्मचाऱ्यांची आठवड्यातून एक दिवस तरी कार्यालयात उपस्थिती अनिवार्य असल्याचे यामध्ये म्हटले आहे. तरी एखादा कर्मचारी ड्युटीवर हजर झाला नाही तर त्या कर्मचाऱ्याची गैरहजेरी लावून त्याचा पगार कपात करावा, असेही आदेशात स्पष्ट म्हटलं आहे.