चंद्रकांतदादा आपण कोणामुळे निवडून आलात ?

उदयनराजेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – आम्ही मनाने राजे आहोत. मी मनाने किती मोठा आहे, ते तुम्हाला ठाऊक आहे. पदवीधर निवडणुकीत तुम्ही किती मदत केली होती. ते तुम्ही आठवा म्हणजे कोणामुळे निवडून आला ते कळेल. आता मला यावर काही बोलायचे नाही, असा सूचक इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला. उदयनराजे भोसले यांनी विकास कामाचा निर्धारनामा प्रसिद्ध केला. याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढील पाच वर्षातील कामाचे नियोजन केले आहे. नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. अनेक मोठी विकास कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. तसेच शेती, पाणी, आरोग्य, शैक्षणिक, इंडस्ट्रीयल सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पुढील पाच वर्षात करण्यात येणार असल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

उच्च शिक्षण व कौशल्य विकासासाठी पाच वर्षात प्रयत्न केले जाणार आहेत. करिअर डेव्हलपमेंट कोर्स सेंटरची उभारणी केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सातारा रेल्वे स्टेशनची सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही पुढील पाच वर्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्या प्रमाणे कामे केली जाणार आहेत. तसेच कृष्णा नदी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी संकल्पना ठीक आहे. सध्याचं सरकार स्मार्ट सिटी कागदोपत्री राबवत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.