दुर्देवी ! तलावात बुडून दोघा तरुणांचा मृत्यू

खानापूर (बेळगाव) : खानापूर तालुक्यातील हंदूर येथे मासेमारीसाठी गेलेल्या दोघां तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळच्या दरम्यान घडली आहे. सोमनिंग सद्याप्पा घाळी (वय २४) आणि विठ्ठल सुरेश पाटील (वय १९) हे दोघेही रा. हंदूर असे या मृत तरुणांचे नावे आहेत.

याबाबत अधिक माहितीनुसार, सोमनिंग घाळी आणि विठ्ठल पाटील हे दोघे सोमवारी दुपारच्या दरम्यान तलावात मासेमारीसाठी गेले होते. तलावात खोल पाण्याचा अंदाज न लागल्याने ते दोघे तरुण त्यात बुडाले. सायंकाळ उशीरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांसोबत गावकऱ्याबरोबर शोधाशोध सुरू केली असता, तलावाच्या काठावर त्या दोघांचे चप्पल दिसून आल्याने ते तलावात उतरले असल्याचा संशय आला. तर तलावात शोध घेतला असता त्यामध्येच इकडे तिकडे त्या दोघांचेही मृतदेह आढळून आले. त्यात त्या दोघांनाही पोहता येत नव्हते. मासेमारी करताना दोघांपैकी एक जण पाण्यात बुडाला असावा. त्याला वाचवायला जाऊन दोघाही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला असावा. अशी माहिती नंदगड पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, सोमनिंग घाळी आणि विठ्ठल पाटील हे एकुलते होते. विठ्ठलच्या पश्‍चात आई, वडील आणि दोन बहिणी तर सोमनिंग याच्या पश्‍चात आई-वडील व बहीण असे त्यांचे कुटुंब आहेत. या दोघा तरुणांचा मृत्यु झाल्याने कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.