निधीअभावी ‘बेटी’च्या जिल्ह्यातच ‘बेटी बचाव बेटी पढाव’ला घरघर

बीड : पोलीसनामा आॅनलाइन – मागील २ वर्षापासून निधी न मिळाल्याने महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्याच जिल्ह्यातील बेटी बचाव बेटी पढाव योजनेला घरघर लागली आहे. निधीअभावी ही योजना रखडली असून उदिष्ट्य पूर्ण कसे होणार? असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी बेटी बचाव, बेटी पढाव योजनेची आढावा बैठक बोलावली होती. या आढावा बैठकीत कृती कार्यक्रमावर कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. केवळ सूचनांचाच भडीमार झाला.
बीड जिल्ह्यात बेटी बचाव बेटी पढाव योजनेची अत्यंत आवश्यकता आहे. स्त्री भ्रूण हत्येच्या प्रकरणांमुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे. अशा स्थितीत मुलींचा जन्मदर तसेच मुलीच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. बेटी बचाव बेटी पढावसारख्या योजना प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत, तो पर्यंत ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये सकारात्मक बदल घडून येणे शक्य नसल्याचे मत येथील तज्ञ व्यक्त करत आहेत.

बीड जिल्ह्याला सन २०१६ मध्ये बेटी बचाव बेटी पढाव या योजनेसाठी ४० लाख रूपयांचा निधी आला होता. या निधीतून वेगवेगळे समाजउपयोगी उपक्रम घेण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत एक पैसाही या योजनेला सरकारने दिलेला नाही. एकीकडे बीड जिल्ह्यातील सत्ताधारी नेते बेटी बचाव बेटी पढाव योजनेचे राज्यभरात कौतुक करतात. तर दुसरीकडे मात्र प्रत्यक्षात ती योजना निधीअभावी ठप्प केली जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, महिला व बाल कल्याण विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्याने २ वर्षापूर्वी आलेल्या निधीचे ऑडीटच केलेले नाही. नियमाप्रमाणे या योजनेअंतर्गत झालेला खर्च शासनाकडे दाखल करणे अपेक्षीत होते. मात्र, गत २ वर्षातील ऑडीटच दाखल झालेले नाही. परिणामी यावर्षी बीड येथील बेटी बचाव बेटी पढाव योजनेला निधी आलेला नाही. तसेच तो येण्याची शक्यता देखील नाही, असे म्हटले जात आहे.

जाहिरात