मोदींऐवजी अभिनेता अमिताभ बच्चन यांनाच निवडून द्यायला हवं होतं : प्रियंका गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या जागतिक किर्तीच्या अभिनेत्यापेक्षा अमिताभ बच्चन यांनाच निवडून द्यायला हवं होतं, असं म्हणत त्यांनी मोदींना टोला लगावला. मिर्झापूर येथे झालेल्या रॅलीत त्या बोलत होत्या. नरेंद्र मोदी यांनी निवडून आल्यानंतर काहीही काम केलेले नाही. ते जागतिक दर्जाचे अभिनेते आहेत. त्यांच्याऐवजी अमिताभ बच्चन यांना निवडून दिले असते आणि त्यांना पंतप्रधान केले असते तर त्यांनी देखील मोदींप्रमाणेच काहीही केलं नसतं, असं देखील प्रियांका यावेळी बोलताना म्हणाल्या.

भाजपने आणि पंतप्रधान मोदी यांनी आजपर्यंत दिलेले एकही आश्वासन पाळलेले नाही. त्यांचे लक्ष फक्त सत्ता मिळवणे हेच आहे. यावेळी त्या बोलत असतानाच अजान झाली. त्यावेळी काही क्षणांसाठी प्रियंका गांधींनी त्यांचं भाषण थांबवलं. अजान पूर्ण झाल्यावर त्यांनी पुढे बोलण्यास सुरूवात केली. बोलताना पुढे त्या म्हणाल्या की, काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी खूप कामे केलेली आहेत. काँग्रेस कायमच सामान्य माणूस तसेच शेतकऱ्यांच्या पाठीची उभी राहिली आहे. दरम्यान, यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. आता प्रियांका गांधींच्या या टीकेवर भाजप नेते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.