कमालच झाली राव ! मुले पळवणारी टोळी समजून काँग्रेसच्या नेत्यांना गावकऱ्यांकडून बेदम मारहाण, सर्वत्र खळबळ

बैतुल (मध्यप्रदेश) : वृत्तसंस्था – जमावाकडून मारहाण होण्याच्या घटना देशभर घडत आहेत. या मारहाणीतून काँग्रेसच्या नेत्यांची देखील सुटका झालेली नाही. मध्यप्रदेश राज्यातील बैतुल जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी समजून काँग्रेसच्या दोन नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचवले पण आरोपी पसार झाले होते.

बैतुल जिल्ह्यातील शाहपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. काँग्रेस नेते धर्मेंद्र शुक्ला, रामू सिंह लांजीवार आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधी ललित बारस्कर गुरुवारी रात्री केसिया गावामधून कारने जात होते. यावेळी गावातील रस्त्यावर फांद्या पडलेल्या होत्या, त्या फांद्या पाहून ते घाबरले आणि त्यांनी कार पुन्हा माघारी वळवली.कार परत फिरत असल्याचे पाहून ग्रामस्थ आक्रमक झाले आणि कारवर हल्ला चढवला. मुलं पळवणारी टोळी असल्याची गावकऱ्यांना शंका आली आणि त्यांनी या तीनही नेत्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात कारचेही मोठे नुकसान झाले, शिवाय नेत्यांनाही दुखापत झाली आहे.

बैतूल जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून लहान मुलांना चोरणारी टोळी सक्रिय झाली असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते जेव्हा कारने प्रवास करत होते तेव्हा ते तिघे मुलांना पळवणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचा संशय गावकऱ्यांना आला. गावकऱ्यांनी गाडी अडवली आणि कारमधून बाहेर काढून त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत काँग्रेसचे धर्मेंद्र शुक्ला, रामू सिंह लांजीवार आणि ललित बरास्कर जखमी झाले आहेत. शाहपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दीपक पराशर यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटेनची माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी दाखल झालो. मात्र आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.