नवर्‍यानं पकडला बायकोचा हात, मेहुणा अन् सासर्‍यानं केला जावयाचा घात

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – बायकोचा हात पकडून घरी चलण्याचा हट्ट करणार्‍या नवर्‍या ला त्याच्या सास-याने आणि मेहुण्यानं मिळून लोखंडी राॅडने आणि कुर्‍हाडीने हल्ला करुन खून केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील माजरी (खदान) येथे २७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

संदीप हरिदास साबळे (वय ३०) रा.एकता नगर माजरी असे मृत युवकाचे नाव आहे. त्याने काही वर्षापूर्वी येथीलच रहिवाशी अमृतलाल केवट यांची लहान मूलगी ज्योती हिचे सोबत प्रेमविवाह केला होता. दरम्यान संदीपला एक मुलगा व एक मूलगी अशी दोन अपत्ये होती. एक वर्षापूर्वी त्याचा मुलगा ज्योती आपल्या माहेरी असताना नाल्यात बुडून मरण पावला. तेव्हा पासून त्यांचे आपसात झगड़े सुरु झाले.

संदीप हा पत्नीला मारहाण करत असल्याने तेव्हापासून ज्योती आपल्या मुलीला घेवून माहेरी राहत होती. संदीप हा नेहमी दारू पिऊन सास-याकडे जावून पत्नी व सासऱ्या सोबत नेहमीच भांडण करायचा. दरम्यान एक महिन्यापूर्वी पती-पत्नी मध्ये भांडण झाले होते. घटनेच्या दिवशी रविवारी (दि. २७) रोजी सांयकाळी ७.३० वाजताच्या सुमारास संदीपची पत्नी ही रेल्वे कॉलनीत मोलकरीणीचे काम करून परत येताना संदीप साबळेने तिचा हात पकडून घरी चल असे म्हणत तिच्यासोबत झटापटी करीत असताना त्याचा साळा विजय अमृतलाल केवट याने मध्यस्थी करून बाहिणीचा हात सोडविला.त्यावरून संदीपने त्याच्या डोक्यावर काचेची बाटली मारली. त्या कारणावरुन त्याचा सासरा अमृतलाल याने लोखंडी रॉड व साळा विजय केवट याने लोखंडी कुऱ्हाडने संदीप साबळे याच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले.

दरम्यान एकता नगरच्या रोडच्या गल्लीतुन जोरदार कल्ला ऐकू आल्याने संदीपचे काका घटनास्थळी धावून गेले असता त्या गल्लीत संदीप हा रक्तबंबाळ अवस्थेत जमीनीवर पडलेला दिसला.यानंतर सासरा अमृतलाल केवट (४८) व मेहुणा विजय केवट (१९) हे हल्ला करून निघून
गेले व थेट पोलिस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. संदीपचे काका चरण साबळे यांनी आजूबाजूच्या लोकांना आवाज देऊन त्यांच्या मदतीने संदीपला उचलून वेकोलिच्या एरिया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान संदीपची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरीता चंद्रपुर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान संदीप साबळे याचा मृत्यु झाला.

माजरी पोलिसांनी आरोपी अमृतलाल केवट (४८) व विजय केवट (१९) यांच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजरीचे ठाणेदार सदाशिव ढाकणे पुढील तपास करीत आहेत.आरोपिंना आज दि. २८ सप्टेंबर रोजी भद्रावती येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान एका आठवड्यात हत्येच्या दोन घटना घडल्याने माजरीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.