जादुटोण्याचा संशय ! चौघांना निर्वस्त्र करून मारहाण, 25 गावकरी जिवंत जाळणार तेवढ्यात…

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – पुरोगामी महाराष्ट्र आहे असे जरी म्हटले जात असली तरी अद्याप अंद्धश्रद्धेचं भूत काही जणांच्या मानगुटिवर बसलेले आहे. अंधश्रद्धेतून कल्याण येथे माय-लेकरांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली आहे. अंगात संचारलेल्या महिलेनं चौघांची नावं घेतल्यानंतर गावकऱ्यांनी जादुटोण्याच्या संशयावरून त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवंत जाळणार होते. तोपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे. राजापूर हमेशा गावात शनिवारी मध्यरात्री हा अघोरी प्रकार घडला. येथील एका महिलेच्या सांगण्यावरून जादुटोण्याच्या संशयावरून काही गावकऱ्यांनी चौघांना बेदम मारहाण केली. त्यांना निर्वस्त्र केलं. त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलीस आल्याने चौघांची गावकऱ्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली.

महिलेच्या सांगण्यावरून केलं कृत्य
जादुटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी चौघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. गावातीलच एका महिलेच्या अंगात संचारलं होतं. तिनं गावातील चौघांची नावं घेतली. गावकऱ्यांनी तिच्या सांगण्यावरून, चौघांना घराबाहेर खेचून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना निर्वस्त्रही केलं. हा अमानुष प्रकार सुरु असतानाच, काही जणांनी त्यांच्यावर पेट्रोल ओतलं. दरम्यान, गावातील काही सुज्ञ नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौघांची सुटका केली. पोलीस जर आले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.

महिलांसह 17 जणांवर गुन्हा
जादुटोण्याचा संशय आणि अंगात आलेल्या महिलेनं नाव घेतल्याने गावातील जमावाने चौघांना मारहाण केली. यामध्ये चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तालुक्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या प्रकरणी महिलांसह 17 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सध्या या गावामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात प्रचंड तणाव आहे. दरम्यान, ही घटना नेमक्या कोणत्या कारणावरून घडली याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच इतर आरोपींचा देखील पोलीस शोध घेत आहेत.