भंडारा : मृत बालकांची ओळख न पटवताच मृतदेह पालकांच्या हवाली, शोकाकुल जन्मदात्यांची रुग्णालय प्रशासनाकडून क्रूर थट्टा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशवासीयांच्या काळजाच पाणी करणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.(Bhandara Hospital Fire) जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात केअर युनिटच्या अतिदक्षता विभागात शनिवारी (दि. 8) मध्यरात्री आग लागली अन् ज्यांना निट हालचालही करता येत नाही, अशा 10 निष्पाप, निरागस जीवांना या आगीने भक्ष्य केले. नियतीने 10 जन्मदात्यांवर सूड उगवला तर प्रशासनाने त्याच्या पुढचे पाउल टाकले. डीएनए टेस्ट न करताच धगधगत्या आगीतून अलगद निखारा काढावा, त्याप्रमाणे होरपळलेल्या ‘त्या’ मृत जीवांची तत्परतेने ओळख पटविण्याचा चमत्कार करून रुग्णालयाच्या प्रशासनाने मृत बालकांचे जन्मदाते, त्यांचे आप्तस्वकियच नव्हे तर उभ्या जगाचीही रडकी बोळवण केली. मात्र आगीने होरपळलेल्या आणि धुराने काळवंडलेल्या मृत बालकांची ओळख तेथील संबंधितांनी झटपट कशी पटवली, हा सामान्य नागरिक नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनाही खटकणारा प्रश्न आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयात आग कशी लागली, कुणाच्या निष्काळजीपणामुळे लागली याचा शोध सुरु आहे. पीडितांच्या भाव-भावनांनाही रुग्णालयातील आगीच्या हवाली करण्याची निर्लज्ज धावपळ प्रशासनाने चालविली आहे. ज्या आगीने लोखंडी पट्टयांना पिघळवले त्या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या कोवळ्या बालकांची अवस्था काय झाली असेल, हे सहज लक्षात यावे. या बालकांची नाजूक नितळ त्वचा त्यांचा चेहरा खरेच शाबूत राहिला असेल का, या प्रश्नाचे उत्तर अपवादानाचे कुणाकडून ‘हो’ मिळेल. 10 पैकी एक दोन बालकांच्या बाबतीत तसे झालेही असेल. मात्र, 10 पैकी 9 बालकांचे (एक बिचारा बेवारस म्हणून सापडला होता अन् त्याची प्रकृती चांगली नसल्याने त्याला येथे दाखल केला होता.) कलेवर संबंधित डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी आग विझल्यानंतर लगेच पीडित परिवारांच्या पदरात घातले. हे तुमचेच आहे, असे म्हणत त्या शोकविव्हळ परिवारांना स्मशानाच्या वाटेने लावले. बाळ जन्माला आल्याचा आनंद गगनात मावेनासा झाल्याची औटघौटकेची भावना अन् नंतर काळीज चिरणारे दुख पदरात घेऊन पदरात पडलेल्या मृत जीवाला घेऊन निघालेल्या पीडितांना हे बाळ आपलेच की दुसऱ्याचे ते विचारण्याचे भान असण्याचे कारण नाही. मात्र, ते बाळ त्यांचेच हे संबंधित डॉक्टर, पारिचारिका आणि ईतर कर्मचाऱ्यांनी एवढ्या लवकर कसे काय ठरवले, हा लाखमोलाचा प्रश्न ठरतो.

मृतांची अदलाबदली होण्याचा धोका ?
प्रसूती तज्ज्ञ, नवजात शिशू तज्ज्ञ आणि त्वचा तज्ज्ञांच्या मते आईने जन्माला घातल्यानंतर पहिले दोन आठवडे शिशू सगळ्यापासूनच बेखबर असतो. चार आठवड्यापासून तो प्रतिसाद देणे सुरू करतो. हसने, आईकडे बघणे, टकटकी लावणे आकार घेण त्याच आपल सुरू होते. 6 आठवड्यांपर्यंत त्याची त्वचा एवढी कोमल असते की गरम वाफेचाही त्याला धोका होऊ शकतो. अशात रुग्णालयाच्या आगीत ज्या 10 नवजात बालकांचा बळी गेला, त्यांची आगीनंतर लगेच ओळख पटणे अशक्यच आहे. या संदर्भात बोलताना सुप्रसिद्ध जेनेटिसिस्ट डॉ. विनय टुले म्हणाले की, एक नव्हे 10 बालकांचे प्राण गेले. घटनास्थळी गोंधळ उडाला असेल यात शंकाच नाही. त्यामुळे मृतांची अदलाबदली होण्याचा धोका आहे. अशात मातापित्यांच्या हवाली मृतदेह करण्यापूर्वी डीएनए टेस्ट करायला हवी होती.

धावपळ, गडबड अन् …
प्रत्यक्षदर्शींच्या मते शनिवारी मध्यरात्री जेव्हा आग लागली तेव्हा सर्वच जण साखर झोपेत होते. थंडीचे दिवस असल्याने आगीकडे बराच वेळ कुणाचे लक्ष गेले नाही. नंतर मात्र एकच धावपळ उडाली. निरागस बालक असलेल्या आणि आग लागलेल्या कक्षासमोर खुपच गोंधळ आरडाओरड सुरू झाली होती. आग विझवल्यानंतर घाईगडबडीतच सर्व बालकांना एसएनसीयूतून बाहेर काढले. 10 जणांचा मृत्यू झाला होता. हादरलेले, गोंधळलेले भंडारा प्रशासन निस्तरण्यासाठी कामी लागले होते. मृत बालकांचे काही नाव नव्हतेच. गळालेल्या त्वचेला साफ करून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पीडितांना हाक दिली अन् तो निष्प्राण जीव त्यांच्या पदरात घातला. संबंधित प्रशासनाने या घिसाडघाईतून काय साध्य करण्याचा किंवा दडवण्याचा प्रयत्न केला, हे काही दिवसांनी पुढे येईल. पण मृताची अदलाबदल झाली असेल तर…?