भेंडवळचं भाकित : यंदा सर्वसाधारण पीक, आर्थिक संकटही ओढवण्याची भिती

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन –  खरीप हंगामात मृग नक्षत्रात जून महिन्यात पेरणीयोग्य साधारण पाऊस, जुलै महिन्यात चांगला पाऊस, ऑगस्टमध्ये साधारण कमी-जास्त पाऊस, सप्टेंबरमध्ये ऑगस्टपेक्षा जास्त पाऊस; तसेच अवकाळी पावसाचा धोका असल्याचं संकेत भेंडवळच्या भविष्यवाणीतून देण्यात आले आहेत.

यंदा पीक परिस्थिती सर्वसाधारण

विदर्भातील प्रमुख पांढरे सोने अर्थात कपाशीचे पीक साधारण येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. खरिपातील मुख्य पीक ज्वारी कायम आहे. पीक साधारण राहील, सोबतच ज्वारीची नासाडी संभवते. तुरीचे पीक चांगले येईल. कारण घटात तुरीचा दाना आत व बाहेर आहे. मूग कायम आहेत. त्यामुळे पीक साधारण, उडीदचे पीक साधारण असून घटात एक दाणा बाहेर असल्याने भावात तेजी संभवते. तिळाचे पीक चांगले येईल. मात्र नासाडी संभवते. कारण घटात तीळ आत व बाहेर आहेत. भादली दोन बोट एक दाणा बाहेर आहे. तसेच आजूबाजूला पसरलेली आहे. त्यामुळे पीक साधारण राहील. बाजरीचे पीक चांगले आहे. कारण घटातील बाजरी दबलेली असून मोघम आहे. साळी (तांदूळ) मोघम असल्याने कमी- अधिक पीक, जवस मातीत गेल्याने तेलवाणाचा तुटवडा संभवतो. लाख, वाटाणा साधारण, गहू व हरभरा पीक चांगले येणार आल्याचे भाकीत मांडणीत वर्तविण्यात आले आहे. एकंदरीत यंदा सर्वसाधारण पीक परिस्थिती राहील.

आर्थिक संकट ओढवण्याची भीती

घटामध्ये ठेवलेली करंजी गायब आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच प्रतीक गायब असल्याने जागतिक आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वीही आर्थिक मंदीचे भाकित तंतोतंत खरे ठरले आहे, असा दावा करण्यात आला आहे. घटामध्ये पृथ्वीचे प्रतीक मानण्यात येणारी पुरी गायब असल्याने पृथ्वीवर नैसर्गिक आपत्ती ओढवण्याची शक्यता असून, कराव्यात भरपूर पाणी असल्याने जलाशये, समुद्रात भरपूर पाणी राहील. घटातील सांडोळी, कुरडीचे भाग आहेत, त्यामुळं चारापाण्याची टंचाई संभवते. देशाच्या संरक्षण व्यवस्थेसह परकीय शत्रूंच्या घुसखोरीबाबत संकट कायम राहील, सोबतच संरक्षण व्यवस्था मजबूत राहील.

पारावरील मांडणीत साम्य

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मारोतीच्या पारावरही मांडणी करण्यात येते. त्याचे नऊ दिवसांनी पुंजाजी महाराज निरीक्षण करतात. त्या मांडणीत घटातील माल काळा पडला आहे, कोणत्याही खनावर माल नाही. म्हैस, गाढव, सातदानी, नाकतोडा, कातनी घटात आहेत. घटातील राजा कायम असून, करव्यातील खालच्या भागावर बुरशी आलेली आहे. एकंदरीत पारावरील व अक्षय तृतीयेच्या घटमंडणीच्या भाकितात साम्य आहे.

‘अशी’ होते मांडणी…..

भेंडवळ गावाजवळील नरहरी वाघ यांच्या शेतात पारंपरिक पद्धतीने घटमांडणी करण्यात आली. चंद्रभान महाराजांच्या जयघोषात सुमारे ७ फूट व्यासाचा गोलाकार घट तयार करण्यात आला. या घटामध्ये १८ प्रकारच्या धान्यराशी अंबाडी, कपाशी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, हिवाळी मूग, तांदूळ, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडी, मसूर समान अंतरावर गोलाकार घटामध्ये मांडण्यात आल्या. घटाच्या मध्यभागी दोन फूट व्यासाचा खड्डा करून त्यामध्ये मातीची चार ढेकळे ठेवण्यात आली. ही मातीची चार ढेकळे पावसाच्या चार महिन्याचे प्रतीक मानण्यात येते. त्या चार ढेकळांवर पाण्याने भरलेला करवा (मातीचे भांडे) ठेवण्यात आले. करव्यावर वडा, भजा, करंजी (कानोला), पुरी, सांडोळी, कुरडी, पापड, पानविडा, सुपारी आदी ठेवण्यात आले. घटातील अंबाडी हे कुलदैवत, मसूर शत्रूचे, करडी संरक्षण व्यवस्था, सुपारी राजा, पानविडा राजाची गादी, पुरी पृथ्वीचे, सांडोळी, कुरडी चारापाण्याचे, करंजी अर्थव्यवस्थेचे प्रतीक मानण्यात येते.