लोकसभा मतमोजणी आधीच कमलनाथ सरकार अल्पमतात ?

भोपाळ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांचे निकाल लागायला अजून तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र देशभरात याआधीच राजकीय उलथापालथ होण्यास सुरुवात झाली आहे. देशाची सत्ता कुणाकडे जाणार याची चर्चा सगळीकडे सुरु असताना मध्यप्रदेशात मात्र काँग्रेसला मोठा झटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात राज्यातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपचे नेते प्रतिपक्ष गोपाल भार्गव यांनी राज्यपालाला पत्र लिहून विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.

याविषयी अधिक बोलताना भार्गव म्हणाले कि, संपूर्ण देशात भाजपला ज्याप्रकारे पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे कमलनाथ सरकार मधील आमदार त्यांना कंटाळले आहेत. ते स्वतःहूनच आमच्याकडे येण्यासाठी तयार आहेत, त्यामुळे घोडेबाजार करण्याची आम्हाला गरज नाही. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करावे. याचविषयी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गीय यांनी भाष्य केले होते. काँग्रेसने सत्ता आल्यास १० दिवसांत शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जाईल,अशी घोषणा केली होती. तसे न झाल्यास मुख्यमंत्री बदलण्यात येईल असेदेखील काँग्रेसने म्हटले होते.

दरम्यान,या सगळ्या विषयावर किती विश्वास ठेवायचा हे २३ तारखेनंतरच स्पष्ट होईल.