ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील प्रमुख शहरांमध्ये व महापालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य गरीब माणसाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
आज झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.
-मुंबई वगळून इतर महानगर क्षेत्रांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प
-स्ट्रेस फंड निर्माण करणे
-राज्यातील मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय pic.twitter.com/wSr9MhMbC4— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 31, 2020
मुंबई महानगर वगळता मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्यासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी व त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी स्ट्रेस फंड उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. या स्ट्रेस फंडाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील पुनर्वसन सदनिकांच्या बांधकामांसाठी बँकांकडून विकासकाला कर्ज उपलब्ध होईल व योजना गतीने पूर्ण होईल. तब्बल पाच वर्षांनी आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची ही बैठक झाली.
यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कायद्यामध्ये जे काही बदल करणे आवश्यक आहे ते लवकरात लवकर केले जातील. तसेच स्ट्रेस फंड उभारण्याबाबत आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणला जाईल. तर मुंबई महानगर वगळता मुंबई महानगर क्षेत्रातील नगरपालिका आणि महानगरपालिकासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण उभारण्यात यावे, अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.