ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मंदिरे, सर्व धार्मिक स्थळे उघडण्याबाबत केली मोठी घोषणा

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला मोठं गिफ्ट दिले आहे. गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले मंदिर (temples) अखेर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाडव्यापासून (सोमवार) राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे (opening-temples-from-padva) उघडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackery) यांनी शनिवारी (दि. 14) केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, दिवाळीचे मंगलपर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहू नका. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव-देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळली आहे.

या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंद असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांनाच करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा’, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.