मराठा आंदोलनात ‘बलिदान’ दिलेल्या कुटुंबीयांना देणार नोकरी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 12 ऑगस्ट : मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणार्‍यांच्या कुटुंबीयांला नोकरी देणार आहे, असा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेतला आहे.

मराठा आंदोलनमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबत मागील सरकारने निर्णय घेतला होता. आज या विषयावर पुन्हा चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळामध्ये त्यांना नोकरी दिली जाणार आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील आजचे महत्त्वाचे निर्णय :
– मुंबई शहर बेटावरील उपकरप्राप्त इमारतीमध्ये राहणार्‍या लाखो रहिवाशांना इमारत पुनर्विकासाबाबत दिलासा म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.

– आर्थिक विवंचनेतील आदिवासींना आधार देणारी खावटी योजना पुन्हा सुरु करणार आहे, असाही निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. 2013-14 पासून ही योजना बंद होती. आता या योजनेत 100 टक्के अनुदान देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले आहे. यानुसार ही योजना एक वर्षासाठी सुरु ठेवली जाणार आहे.

-एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे 2019-20 या शैक्षणिक वर्षात खुल्या प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांऐवजी खासगी विनाअनुदानीत महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागलाय. अशा 112 बाधित विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 7 कोटी 49 लाख 38 हजार 600 रुपये प्रतिपूर्ती देणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले आहे.

-प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर 2020 या कालावधीकरीता अख्या चण्याऐवजी प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित करण्यात येणार आहे, असाही निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.

– महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1 हजार 500 कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रिमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.

– राज्यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि 3 दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात येणार आहे, असा देखील निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.