ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या 30 जूननंतरच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वत्र दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र कडक निर्बंध लावण्यात आले आहेत तर काही जिल्हयांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राज्य शासनातील कर्मचार्‍यांच्या सालाबादाप्रमाणे होणार्‍या सर्वसाधारण बदल्या हया एप्रिल अथवा मे महिन्यात होतात. गतवर्षी कोरोनामुळेच सर्वसाधारण बदल्या करण्याची मुदत वाढविण्यात आली होती. तर यंदा (सन 2021) म्हणजेच सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षामध्ये दि. 30 जून पर्यंत कोणत्याही बदल्या (सर्वसाधारण बदल्या तसेच काही अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणामुळे करावयाच्या बदल्या) करण्यात येऊ नयेत असा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं घेतला आहे.

दरम्यान, नमूद कालावधीत केवळ खालील कारणास्तव बदली अनुज्ञेय राहील.

1. सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरणे.

2. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरणे.

3. शासकीय कर्मचार्‍याच्या विरोधात गंभीर स्वरूपाची साधार तक्रार प्राप्त झाल्यामुळे बदली करणे आवश्यक असल्याची बदली करणार्‍या सक्षम प्राधिकार्‍याची खात्री पटल्यास करावयाची बदली.