भाजपमधील जुने लोक सतरंज्या उचलण्याच्या कामाचे : जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा टोला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपामधील जुनी लोक सतरंज्या उचलण्याचे काम करीत आहेत. राष्ट्रवादीमधून गेलेले लोक त्यांना शिकवण्याचे काम करीत आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज जामखेड येथे आली होती. त्यावेळी पाटील बोलत होते. खा. अमोल कोल्हे, महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर, रोहित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, मधुकर पिचड यांच्यावर शरद पवार यांनी विश्वास टाकला होता. मात्र त्यांनी साथ सोडली. चांगले-वाईट दिवस येत जात असतात. मात्र वर्षोनुवर्षे जागा अडवलेली लोक जात आहेत. हे बरे झाले. आता नवीन नेतृत्वाला जागा मिळतील.

मुख्यमंत्र्यांना जामखेडमध्ये येऊन सांगावे लागत आहे की, पुढच्या मंत्रीमंडळात मंत्री करेल. मात्र ते निवडून तर यायला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी रोहित पवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविला. ते म्हणाले की, प्रा. राम शिंदे यांनी संपूर्ण मतदारसंघात फ्लेक्स बोर्ड लावून कोटी-कोटी रुपयांची कामे केली असल्याचा प्रचार चालू केला आहे. पण कामे दिसतच नाहीत, अशी वेळ आहे. हे पुन्हा मंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहेत.
आरोग्यविषयक वृत्त –