शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना मोठा दिलासा ! वाद थांबवण्याचे वारकरी संप्रदायाचे आवाहन

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाकाळात मंदिर बंद आहेत. देव पण लॉक केले आहेत. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. स्वत:ची काळजी स्वतः घ्या. त्यामुळे उपास तापास बंद करा, रोज 4 अंडे खा. दिवसाआड चिकन खा अन् प्रोटिनयुक्त भरपूर खा असा सल्ला आमदार गायकवाड यांनी दोन दिवसापूर्वी दिला होता. या विधानामुळे वारकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली होती. मात्र याप्रकरणी ह.भ. प. प्रशांत महाराज यांनी आमदार गायकवाड यांची त्यांच्या बुलडाणा येथील कार्यालयात जाऊन भेट घेऊन चर्चा केली. या प्रकरणात भाजपच्या मंडळीकडून राजकारण होत असल्याने आता हा विषय वारकऱ्यांनी इथेच थांबबावे, असे आवाहन महाराजांनी केले आहे. यामुळे आमदार गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार गायकवाड म्हणाले की, मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. मी जे बोललो तो आज देशाचा डायट प्लॅन आहे. मांसाहार सेवनाचे आवाहन केंद्र शासनापासून तर राज्य शासन नेहमीच करत आले आहे. मात्र, भाजपाच्या वारकरी सेलकडून या विषयाला वेगळे वळण दिले जात असल्याचे ते म्हणाले. दरम्यान मांसाहाराबाबतच्या वक्तव्यावर भाजपने टीका केल्यानंतर आमदार गायकवाड यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. देशाचे पंतप्रधान हे पाकिस्तानात गेल्यावर बिर्याणी खातात. तेंव्हा या लोकांनी म्हटल नाही की धर्मभ्रष्ट झाला आहे म्हणून? आज मला हे असे सांगतात की तुमच्या विधानामुळे हिंदू धर्माची भावना दुखावली गेली. आज 70 ते 80 टक्के लोक नॉनव्हेज खातात, त्यांचा कुठला धर्म भ्रष्ट झाला किंवा तुम्ही कुठे त्यांना धर्माच्या बाहेर करणार आहे?’ असा सवालही आमदार गायकवाड यांनी विचारला आहे.