‘सीएम’ म्हणतात, योग्य ‘वेळ’ आल्यावर पूरग्रस्त भागाला देणार ‘भेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पावसाचा कहर सुरूच आहे. अनेक ठिकाणे पूरग्रस्त झाली आहेत. मदतकार्य सुरु असले तरी हजारो नागरिक पुरात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे सर्वेसर्वा असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मदतकार्यात अडथळा नको, यासाठी योग्य वेळ आल्यावर पूरग्रस्त भागाला भेट देण्याचे वक्तव्य करून होणाऱ्या टीकेतून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

धरणातून पाण्याचा विक्रमी विसर्ग झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याठिकाणी मदतकार्य राबवण्यात येत आहे. मात्र, आता मदतीचे निकष बदलवून वाढीव दुप्पट मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मदतकार्यात अडथळा येऊ नये म्हणून योग्य वेळी पूरग्रस्त भागाला भेट देईन, असेही स्पष्ट करताना पूरस्थितीतून लवकरच राज्याला दिलासा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील पूरस्थितीचा आढावा त्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे घेतला.