निलंगेकर कोण आणि देशमुख कोण याचं जनतेला देणंघेणं नाही : पालकमंत्री निलंगेकर

लातुर : पोलीसनामा ऑनलाइन – निलंगेकर कोण आणि देशमुख कोण याच जनतेला देणेघेणे नाही केवळ राष्ट्रहिताची कामे महत्वाची असल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हंटल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दि. 8 एप्रिल रोजी जिल्हयातील औसा येथे प्रचार सभा असल्याची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

मी काँग्रेसला लातुरच्या बाहेर पडू देणार नाही असे वक्‍तव्य संभाजी पाटील निलंगेकर यांनी काही दिवसांपुर्वी केले होते. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने थेट निलंगा येथे सभा घेण्यात आली. त्यावेळी अमित देशमुख यांनी पालकमंत्र्यांवर हल्‍लाबोल केला होता. त्यांच्या टिकेला निलंगेकरांनी उत्‍तर दिले नाही. काँग्रेसने गेल्या 60 वर्षात काय केलं ते सांगाव, जनतेची दिशाभुल करू नये असे ते म्हणाले. आम्ही पाच वर्षात जे केले त्यावर आम्ही बोलणार असे त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजपची प्रचार यंत्रणा आपण हायजॅक केली काय असा प्रश्‍न त्यांना विचारला असता त्यांनी काँग्रेसला हायजॅक केल्याचे सांगितले. जनतेला निलंगेकर कोण आणि देशमुख कोण याच्याशी काहीएक देणघेण नाही तर केवळ राष्ट्रीय हित महत्वाचे आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.