जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या, प्रचारसभेत बोलताना नितीश कुमार यांनी केली मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जातींसाठी लोकसंख्येवर आधारित आरक्षणाला ( population-based-reservation-for-castes) आपला पाठिंबा असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (chief-minister-nitish-kumar) यांनी जाहीर केल आहे. मात्र लोकसंख्येची योग्य माहिती उपलब्ध असेल तरच त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते असेही ते म्हणाले आहेत.

जदयूचे वाल्मिकीनगरमधील खासदार वैद्यनात महतो यांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यानिमित्ताने आयोजित प्रचारसभेत नितीश कुमार बोलत होते. दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून सध्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरु आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा – सुव्यवस्थेवरुन आरजेडीवर जोरदार हल्लाबोल केला. तेजस्वी यादव यांनी दिलेल्या 10 लाख रोजगाराच्या आश्वासनांचीही त्यांनी खिल्ली उडवली.

जिथपर्यंत लोकसंख्येचा प्रश्न आहे तो निर्णय जनगणना झाल्यानतरच घेऊ शकतो. तोपर्यंत निर्णय आपल्या हातात नाही. जातींच्या लोकसंख्येच्या आधारे आरक्षण असावे यामध्ये आमच्यात कोणतही दुमत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. नितीश कुमार यांनी यावेळी जातीनिहाय लोकसंख्येची गणना व्हावी का यासंबंधी स्पष्ट भाष्य केल नाही. लोकांनी मला 15 वर्ष त्यांची सेवा करण्याची संधी दिली. त्यांनी पुन्हा संधी दिली तर लोकांमध्ये जाऊन दखल न घेतलेल्या समस्यांबद्दल चर्चा, तसेच त्यांच्यासाठी काम करणार असे आश्वासन नितीश कुमार यांनी यावेळी दिले आहे. आपल्या सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग, अत्यंत मागासवर्ग आणि महादलित यांच्यासह समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल यासाठी प्रयत्न केले आहेत, हे सांगायला ते विसरले नाहीत. नितीश कुमार यावेळी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सहाय्याने आपण बिहारच्या विकासासाठी काम केल्याचा उल्लेख केला.