Bihar Election 2020 : बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होण्याची चाहूल ! नितीश कुमारांचं CM ठाकरेंच्या पावलावर पाऊल ?

पाटणा : वृत्तसंस्था – बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Legislative Assembly election, 2020) रणधुमाळी सुरू असतानाच आज पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. विधानसभेच्या 71 जागांसाठी मतदान होत आहे. संयुक्त जनता दल (Janata Dal (United)), भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) विरुद्ध राष्ट्रीय (Rashtriya Janata Dal) जनता दल आणि काँग्रेस (Congress) असा मुकाबला बिहारमध्ये होताना दिसत आहे. या सगळ्यात आता चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्या लोकजनशक्ती पक्षानं वेगळीच खेळी केल्याचं दिसत आहे. त्यामुळं आता निकाल नेमका काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निकालानंतर नेमक्या काय घडामोडी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकजनशक्ती पक्षानं मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या संयुक्त जनता दलाविरुद्ध उघड भूमिका घेतली आहे. लोजपनं या संयुक्त जनता दलाविरुद्ध उमेदवारही उभे केले आहेत. परंतु भाजपविरुद्ध उमेदवार दिलेले नाहीत. लोजपच्या या भूमिकेनं संयुक्त जनता दलाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा भाजपला मात्र फायदा होईल.

अशातच चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री राष्ट्रीय जनता दलाच्या संपर्कात आहेत आणि ते निकालानंतर महाआघाडीसोबत जातील असा गंभीर आरोप चिराग यांनी केला आहे.

चिराग पासवान म्हणाले की, नितीश कुमारांच्या पक्षाला मतदान केल्यास बिहार उध्वस्त होईल. नितीश कुमार सतत राजदच्या संपर्कात आहेत. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आणि नितीश कुमार एकच आहेत. यंदा आमचा पक्ष संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागांवर लढत आहे आणि आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त जागा जिंकू. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारची अवस्था अतिशय बिकट आहे. हीच परिस्थिती बदलायची आहे म्हणूनच आम्ही मतं मागत आहोत” असंही ते म्हणाले आहे.

महारष्ट्राची पुनरावृत्ती होणार ?

जर चिराग पासवान यांचा आरोप खरा ठरला तर बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होईल. राज्यात शिवसेना आणि भाजपनं युती करून विधानसभेची निवडणूक लढवली. यांना स्पष्ट बहुमत मिळालं. परंतु भाजप मुख्यमंत्रिपद देण्याचं वचन पाळत नसल्याचा आरोप करत शिवसेनेनं भाजपशी फारकत घेत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. यानंतर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मख्यमंत्री झाले.