भाजपला आणखी एक धक्का ! ‘अकाली’नंतर आणखी एक पक्ष NDA मधून बाहेर

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन – कृषी विधेयकाच्या मुद्यावरून भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या अकाली दलानंतर आणखी एका पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दार्जिलिंगमध्ये स्वतंत्र राज्यासाठी आंदोलन केल्यानंतर 2017 पासून फरार असणारे गोरखा जनमुक्ती मोर्चाचे ( GJM) अध्यक्ष बिमल गुरुंग ( Bimal Gurung) यांनी एनडीएतून बाहेर पडल्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. मोदी सरकार दार्जिलिंगसाठी कायमस्वरुपी राजकीय तोडगा काढण्यात अपयशी ठरल्यानं आपण या निर्णयावर आल्याचे त्यांनी सांगितले आहे. एनडीएमध्ये आमची फसवणूक झाल्याचाही आरोप त्यांनी केला आहे

गुरुंग यांनी आपले जवळचे सहयोगी रोशन गिरी यांच्यासोबत मीडियासमोर आले होते. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर अनेक आरोप केले. केंद्राने 11 गोरखा समुदायांना अनुसूचित जाती म्हणून मान्यता देणारे आपलं वचन पूर्ण केले नसल्याचे गुरुंग म्हणाले. 2009 पासून आम्ही एनडीएमध्ये आहोत. परंतु, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आपण दिलेले वचन विसरल आहे. त्यामुळे आम्हाला फसवणूक होत असल्याची जाणीव झाल्याचे ते म्हणाले.

2011 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाविरुद्ध ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कांग्रेसच्या समर्थनाचा संकल्पही गोरखा जनमुक्ती मोर्चानं व्यक्त केला आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाचे फरार नेते गुरुंग यांच्या म्हणण्यानुसार, दार्जिलिंग सोडल्यानंतर पहिली तीन वर्ष ते नवी दिल्ली येथे होते. त्यानंतर दोन महिने ते झारखंडला निघून गेले होते. आज आम्हाला अटक झाली तरी पर्वा नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटल आहे. उल्लेखनीय म्हणजे गुरुंग यांच्याविरोधात आंदोलनात भाग घेण्यासाठी 150 हून अधिक गुन्हे दाखल झाले होते.