राजस्थानात ‘बर्ड फ्लू’चा कहर !

पोलिसनामा ऑनलाईन – अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. कोरोनाने सगळ्या जगाला विळखा घातला आहे. दरम्यान, कोरोनाचं संकट असताना राजस्थानमध्ये (Rajasthan) आणखी एका संकटानं डोकं वर काढलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून कावळ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा निद्रानाश झाला आहे.

राजस्थानच्या हाडौती भागात बर्ड फ्लूमुळे १०० हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. यात झालवाड जिल्ह्यात आतापर्यंत ९३ कावळे मृत्यूमुखी पडले आहेत. याशिवाय, कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडीमध्ये ८, तर मथना गावात १९ कावळे मृत्यूमुखी पडल्याचं आढळून आलं आहे. आतापर्यंत कोटा, बारां, झालावाड, नागौर आणि जोधपूर जिल्ह्यांमध्ये मिळून ३०० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. राजस्थान सरकार आता अलर्ट झालं आहे. राज्याचे पशूसंवर्धन मंत्री लालचंद कटारिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. संपूर्ण घटनेवर आमचं पूर्णपणे लक्ष आहे तसंच यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं कटारिया म्हणाले.

दरम्यान, एका पक्ष्यातून दुसऱ्या पक्ष्याला जर या फ्लूची लागण होत आहे. परिणामी मनुष्यप्राण्यालाही याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पशु चिकित्सकांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.