भाजपनं पुन्हा डावलले, आता काय करणार खडसे ?, चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील वरिष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने पुन्हा डावललं आहे. राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज असलेल्या खडसे यांना राष्ट्रीय कार्यकरणीत संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, खडसेंना भाजपने पुन्हा वेटिंगवर ठेवल्याने ते वाट बगणार की वेगळा मार्ग निवडणार, या चर्चेला आता उधाण आलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज (शनिवारी) केंद्रीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली. त्यात देशभरातील नाराज नेत्यांना सामावून घेतल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील पंकजा मुंडे व तावडे यांच्यावर केंद्रीय सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. पण राज्यातील नेतृत्वावर सातत्याने टीका करणाऱ्या एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे.

मागील विधानसभा खडसेंना निवडणुकीत खडसेंना तिकीट देण्यात आलं नव्हते. त्यांच्या ऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आलं. खडसेंना स्वतःसाठी तिकीट हवं असताना पक्षाने ते दिल नाही. निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा दारूण पराभव झाल्याने ते आणखीच संतापले. विधानपरिषदेवर त्यांना संधी मिळण्याची चर्चा होती. मात्र तेथेही त्यांना डावलण्यात आले.

दरम्यान, एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. तेच त्यांना भोवले असल्याचे बोलले जात आहे. फडणवीस यांनी आपणास त्रास दिला, राज्यातील भाजपचे सरकार जाण्यास फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लिहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या सगळ्यांचा फटका त्यांना बसल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.