‘केवळ पवार आडनाव एवढेच आपल कर्तृत्व’ ! रोहित पवार-अतुल भातखळकर यांच्यात जुंपली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार केला होता. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरून आमदार पवार आणि भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांच्यात सोशल मीडियात चांगलीच जुंपली आहे. राजकीय सोयीसाठी आयुष्यभर कोलांट्या मारणाऱ्या शरद पवार यांच्या नावाने भूमिका बदलण्याबाबत दुसऱ्यावर टीका करावी, हे जरा अतीच नाही का रोहित पवार? केवळ पवार आडनाव एवढच आपल कर्तृत्व आहे, हे पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवलेत तर बरे होईल, असे ट्विट करत भातखळकर यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले असताना दिल्लीत हजारो कोटींच्या नव्या संसद भवनाचे काम सध्या सुरू आहे. रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. केंद्र सरकारने प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज असल्याचे मत आमदार पवारांनी मांडले होते. त्यांच्या ट्विटवर भातखळकरांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्री 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक उभारत आहेत. त्यांना हा प्रश्न विचारा रोहित पवारजी.

आपल्या गृहमंत्र्याने फक्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटीची आहे म्हणतात. ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी, असे म्हणत भातखळकरांनी पवारांवर टीकेचा बाण सोडला होता. त्यानंतर आमदार पवारानी ट्विट करत भाजपला सुनावले आहे. युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असे ऐकले होते. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच असे ट्विट करत पवार यांनी भातळखर यांना प्रत्युत्तर दिले आहे.