बाळासाहेब आणि मुलींची शपथ घेणार्‍या मंत्री परब यांना भाजपाचा टोला, म्हणाले – ‘शपथा घेऊन सुटका होत नसते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने एनआयए न्यायालयात दिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपने सांगितल्या प्रमाणे अखेर या प्रकरणात अनिल परब यांचे नाव समोर आले. दरम्यान बुधवारी सायंकाळच्या सुमारास परब यांनी पत्रकार परिषद घेऊन वाझेंचे आरोप फेटाळले. त्याचबरोबर भावनिक होत माझे दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, सचिन वाझे यांच्या पत्रातील आरोप खोटे आहेत, असे सांगितले.

मात्र आता या पत्रकार परिषदेवरून शपथा घेऊन न्यायालयातून सुटका होत नसते तुम्हीही दिल्लीत जाऊन एखादा वकील गाठा असा उपहासात्मक सल्ला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत दिला आहे.
ते म्हणाले की, “आरारा… काय वेळ आली आहे अनिल परब यांच्यावर…त्यांना कोणी तरी सांगा, ह्याच्या त्याच्या शपथा घेऊन न्यायालयातून सुटका होत नसते. तुम्हीही दिल्लीत जाऊन एखादा वकील गाठा”.

सचिन वाझेंच्या पत्रात काय?

सचिन वाझे यांनी न्यायालयात सादर केलेल्या पत्रात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही नाव आहे. पोलीस आपल्याला सहभागी करून घेतल्यानंतर काही ठिकाणी निदर्शने झाली. त्यावरून गृहमंत्री देशमुख यांनी दूरध्वनी संभाषणाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा निलंबित करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. पण मी त्यांचे मत परिवर्तन करतो त्याबदल्यात मला दोन कोटी रुपये द्यावे लागतील, असे देशमुख म्हणाले. यासाठी असमर्थता दर्शवताच देशमुख यांनी नंतर सावकाश द्या’’, असे सांगितल्याचा दावा वाझे यांनी पत्रात केला. देशमुख यांनी यावर्षी जानेवारी शासकीय निवासस्थानी बोलावून शहरातील १६५० बारकडून प्रत्येकी तीन ते साडेतीन लाख रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.

सैफी बु-हाणी अप लिफ्टमेंट ट्रस्टच्या ( एसबीयुटी) विश्वास्तांविरोधात प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. विश्वास्तांसमोर चौकशी बंद करण्यासाठो ५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवण्यास सांगितले. ‘सीआययू’कडे एका निनावी तक्रारीवर

महापालिकेच्या कंत्राटदारांची चौकशी सुरू होती. यातील ५० ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये गोळा करण्यास अनिल परब यांनी सांगितले होते असा दावा वाझे यांनी या पत्रात केला आहे.

अनिल परब यांचं स्पष्टीकरण

परिवहनमंत्री अनिल परब यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन वाझेंचे आरोप फेटाळले. ते म्हणाले मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे खंडणीचे उद्योग करत नाही. माझे दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, सचिन वाझे यांच्या पत्रातील आरोप खोटे आहेत, मला आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून, सत्य समोर यावे यासाठी नार्कोच नव्हे तर कोणत्याही चाचणीलाही तयार आहे,” असं परब यांनी भावनिक होत सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेते तिसरी विकेट काढणार, असे म्हणत होते. याचा अर्थ त्यांना आधीच सचिन वाझे दोन दिवसानंतर पत्र देणार हे माहिती होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करायचे, असे हे भाजपचे कारस्थान आहे. त्यातूनच वाझे यांच्याकडून ‘एनआयए’मार्फत पत्र लिहून घेण्याचे कथानक भाजपने रचले. महाविकस आघाडीला बदनाम करण्यचा हा डाव आहे.

वाझेंनी दोन आरोप केले आहेत. त्यामध्ये एक सैफी ट्रस्टकडून मी पैसे घेण्यास सांगितले आणि दुसरा जानेवारी २०२१ ला मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना त्यांना दिल्या. हे दोन्ही आरोप चुकीचे असून मी सच्चा शिवसैनिक आहे. खंडणीचे कोणतेही संस्कार आमच्यावर नाहीत. मी जर असे केले असेल तर वाझे इतक्या दिवस गप्प का? असा सवाल उपस्थित करत परमबीर सिंहांच्या पत्रात या गोष्टींचा उल्लेखही नाही, याकडेही परब यांनी लक्ष वेधले. त्यामुळे एनआयए असो वा सीबीआय कोणत्याही चौकशीला सामोरे जायची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.