Maratha Reservation : भातखळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘राज्य सरकारमधील मराठा नेत्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही, धिक्कार असो या नाकर्त्यांचा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 5) महत्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. दरम्यान यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. महावसुली आघाडी सरकारने सत्ता हातात घेतल्या दिवसापासून मराठा आरक्षणच्या विषयाचे पोतेरे केल्याचा घणाघात भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

भातखळकर म्हणाले की, ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांना मराठा विषयाचे फक्त राजकारण करायचे आहे. त्यांना मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचे नाही. त्यामुळेच हा विषय सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. मराठा समाजावर घनघोर अन्याय झाल्याचे ते म्हणाले. भातखळकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयान रद्द केले आहे. ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून मराठा आरक्षणच्या विषयाचे पोतेरे केले आहे. राज्य सरकार न्यायालयात ठामपणे बाजू मांडली नाही. फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेली यशस्वी व्यूहरचना पूर्णपणे कोलमडून टाकली. धिक्कार असो या नाकर्त्यांचा असे भातखळकरांनी म्हटले आहे. दरम्यान राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा घटनाबाह्य असल्याचे न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान म्हटले आहे. यावर बोलताना मी न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो. पण इतर राज्यांत 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण चालत. मग महाराष्ट्राला तोच न्याय का लावला जात नाही, असा सवाल उपस्थित करत खासदार संभाजीराजे छत्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे.