दारुबंदी उठवल्याने चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या – ‘भगिनींनो कंबर खोचून उभ्या राहा, या सरकारने पुन्हा…’

पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या 6 वर्षांपासून चंद्रपूरमध्ये लागू असलेली दारूबंदी अखेर उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी (दि. 27) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. राज्यात वाढत असलेली गुन्हेगारी आणि अवैध दारूविक्री या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, यावरून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी याबाबत माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी दारूबंदीसाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून देत राज्य सरकारवर टीका केली आहे. वाघ यांनी ट्वीटरमधून राज्यातील महिला वर्गाला आवाहन केले आहे. दिवंगत नेते आर. आर. आबा यांनी उभी बाटली, आडवी बाटली करत आणलेली दारूबंदी या सरकारने शेवटी रिचवलीच. भगिनींनो, संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या राहा. परत चार हात करायची वेळ आणली या सरकारने आपल्यावर असे वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान राज्य मंत्रीमंडळाने चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा घेतलेला निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील”, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

झा समितीच्या अहवालानंतर निर्णय
राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झा समितीच्या अहवालातील निष्कर्षांवर चर्चा करून त्यासंदर्भात चंद्रपूरमधील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. गेल्या 6 वर्षांपासून म्हणजेच 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू आहे. मात्र, ही दारूबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी करणारी तब्बल अडीच लाख निवेदने सरकार दरबारी पाठवली आहेत. तर दारूबंदी कायम ठेवावी, यासाठी 30 हजार निवेदन आल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.