काँग्रेसने मतांसाठी हिंदूंना बदनाम केले : अरुण जेटली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समझोता बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंद आणि इतर तीन आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. याप्रकरणी भाजपाने प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने मतांसाठी हिंदू दहशतवादाचा कट रचला असा आरोप अरुण जेटली यांनी केला आहे.

अरुण जेटली म्हणाले की, काँग्रेसने हिंदू दहशतवाद नावाचा कट रचला होता. हिंदू दहशतवाद शब्दाचा वापर करुन या समाजाची प्रतिमा खराब करण्याचे काम काँग्रेसने केले. तथ्यांकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. कोणतेही ठोस पुरावे नसताना युपीए सरकारने या प्रकरणासाठी विलंब लावला गेला. हिंदू दहशतवादाची थिअरी तयार करण्यात आली. जे खरे आरोपी होते त्यांना शिक्षा मिळाली नाही. सामान्य लोकांचे जीव गेले. याची जबाबदारी युपीएने आणि काँग्रेसने घ्यायला हवी असं अरुण जेटली यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण – १८ एप्रिल २००७ ला भारत पाकिस्तानला जोडणाऱ्या समझोता एक्स्प्रेसमध्ये पानिपत जवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ६८ लोक ठार झाले होते. याप्रकरणी संघाचे प्रचारक असीमानंद यांना प्रमुख आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी या तिघांना अटक करण्यात आली होती. पण २० मार्चला पुरावे आणि साक्षीदारांअभावी एनआयएच्या विशेष कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. फक्त संशयाच्या आधारे कोणाला शिक्षा देता येणार नाही असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं असून तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत.