आदित्य ठाकरेंवर भाजपचा पलटवार, ट्विट करून दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बांगड्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून फडणवीस आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात जुंपली आहे. फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी माफी मागण्याची मागणी केली होती. आदित्य यांच्या आरोपांवर आता भजापने पलटवार करत ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा व्हिडिओच ट्विट करून त्याला प्रत्युत्तर दिले आहे. त्याच भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, माझ्याकडून बांगड्यांचा झालेला उल्लेख हा महिलांना आवडणार नाही. त्यामुळे मी माझं वक्तव्य मागे घेतो. त्यानंतर त्यांनी शिवसेना मूग गिळून बसली आहे का ? असा सवाल त्यांनी केला होता. फडणवीसांनी स्पष्टीकरण देत आपलं वक्तव्य मागे घेतल्यानंतरही आदित्य ठाकरेंनी अशी टीका केली. यावरूनच तेच राजकारण करत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे भाजपने म्हटलं आहे.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे ?

आदित्य ठाकरे म्हणाल, देवेंद्रजी, सहसा मी टीकेला प्रत्युत्तर देत नाही. मात्र, तुम्ही भाषणात शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील आम्ही नाही अशी टीका केली होती. बांगड्या हे काही कमकुवतपणाचं लक्षण नाही. त्याला कमी लेखू नका. महिला या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. राजकारण हे होत राहील. मात्र, टीकेचा आणि चर्चेचा स्तर आपण राखला पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकराचं वक्तव्य शोभणारं नाही. त्यामुळे तुम्ही माफी मागितली पाहिजे.