मोदी सरकारवर टीका करण्यासाठी काहीना सोयीच्या गोष्टींचे स्मरण : देवेंद्र फडणवीस

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरु असून अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण होते अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमधील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र येथे सुरु न करता ते गुजरातला नेणे हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. त्यांच्या यी टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीने फेब्रुवारी 2007 मध्ये अहवाल सादर केला होता.

2007 ते 2014 दरम्यान केंद्र किवा राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यासंबंधीच पत्र किंवा साधा अर्जही पाठवण्यात आला नाही. दरम्यान त्याच काळात 2007 साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या संधीचा फायदा घेतला. 2012 पर्यंत कार्यवाही पूर्ण केली आणि काम सुरु केले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.