राधाकृष्ण विखे-पाटलांचा ‘तो’ घोटाळा झाकण्यासाठीच त्यांना ‘मंत्रिपद’ : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सरकारने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. अनेक दिवसांपासून हा विस्तार रखडला होता. नव्याने झालेल्या मंत्रिमंडळात विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसमधून आयात केलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना शपथ घेण्याचा पहिला मान देण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई विकास आराखड्यातील (डीपी) घोटाळ्याची आणखी माहिती पुढे येऊ नये, यासाठीच भाजपने राधाकृष्ण विखे-पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मुंबईच्या विकास आराखड्यातील घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवला होता. मुंबईतील मोठ्या बिल्डरांच्या फायद्यासाठी शहराच्या विकास आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आले. यासाठी तब्बल १० हजार कोटींचा व्यवहार झाला. त्यापैकी पाच हजार कोटींचा पहिला हप्ता भाजपला मिळाला आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. तसंच हा बदल रद्द न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा विखे-पाटलांनी दिला होता. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने राधाकृष्ण विखे- पाटील यांना मंत्रिपद दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

विरोधी पक्षातल्या आमदारांना फोन करून फोडाफोडी केली जाते. लोकशाहीत हे कितपत योग्य आहे ? लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष जिवंत राहिला पाहिजे. पण त्यालाच यांनी गालबोट लावले आहे. आता सरकारने एक फोडाफोडी खाते काढावे आणि त्याचे मंत्री पद गिरीश महाजन यांना द्यावे, असा टोलाही अजित पावर यांनी लगावला.

दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरही टीका केली.