Gopichand Padalkar : पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला करेक्ट कार्यक्रम?

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांचा 3 हजार 716 मतांनी पराभव केला आहे. या निकालावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केले आहे. पडळकर म्हणाले की, पावसात भिजलेल सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला करेक्ट कार्यक्रम? नुतन आमदार समाधान आवताडेंचे 3 हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. जय मल्हार असे त्यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर बोलण्याची उंची नाही. त्यांना दुसऱ्यांच्या लग्नात नाचण्याची सवय असल्याचा टोला ही पडळकर यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे आणि राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत आवताडे यांनी भालके यांच्यावर बाजी मारत विजयी पताका फडकवला आहे. दरम्यान भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनीही या निकालावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पंढरपुर पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यापर्यंत सगळे गल्लोगल्ली फिरले. तरीही लोकानी नाकारले. हा महाविकास आघाडीच्या आमदारांना संदेश आहे. येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका. भाजपा हा एकच पर्याय आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच निवडणूक निकालावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मंगळवेढा-पंढरपूरमध्ये भाजपाचा स्पष्ट विजय झाला आहे. वीज कनेक्शन कापणे, कोविड काळात अनेकांना पॅकेज नाही. पीकविमा नाही, त्यामुळे लोक निवडणुकीची वाट पाहत होते. राज्यातील जनतेच्या मनात महाविकास आघाडी सरकारविरोधात राग आहे. याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागेल असे ते म्हणाले.