‘आमदारकीसाठी बारामतीचे उंबरे झिजवावे लागतात, यातूनच कर्तृत्वाची उंची दिसते’

कोल्हापूर : पोलीनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील धारावी परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची माहिती दिली असताना जनतेने नाकारलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांना ती का झोबली अशी संतप्त विचारणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. बुधवारी जिल्हा उपाध्यक्ष नथाजी पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, उपाध्यक्ष बाजीराव देसाई यांनी त्यासंबंधीचे पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

वेबसाईटवर जावून संघ समाजासाठी काय काम करतो हे पहावे व आपण पराभूत झाल्यानंतर समाजासाठी काय केले याची माहिती वेबसाईटवर द्यावी असे आव्हान या पत्रकातून राजू शेट्टी यांना देण्यात आले आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शेट्टी यांनी ताळतंत्र सोडल्याचा पलटवार करण्यात आला आहे. पत्रकात म्हटले आहे की, राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यभर काम करावे अशी उपहासात्मक टीका केली.

देशामध्ये ज्या-ज्यावेळी संकटे आली तेव्हा संघाचे स्वयंसेवक कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता झोकून देऊन काम करतात. संघ स्वयंसेवकांनी राज्यभर काम करावे, नागपूर मुख्यालयात काम करावे असे उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा आपण कोरोना महामारीच्या काळात काय काम केले हे एकदा स्पष्ट करावे. शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्याचे ढोंग करून त्यांना फसवत आलात व आता तर राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी बारामतीचे उंबरे झिजवायला लागतात यातूनच कर्तृत्वाची उंची दिसते.