भाजप हा शेतमालाची लूट करणारा पक्ष, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP spokesperson Nawab Malik ) यांनी सोमवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत केली आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 11 दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या (दि. 8 डिसेंबर) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांनी भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सामान्य लोकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही मलिक यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाला पाठिंबा देताच भाजपने शरद पवार हे कृषिमंत्री असतानाचे एक पत्र व्हायरल केले आहे. खरेतर पवार यांनी तेव्हा सर्वसमावेशक आणि व्यापक अशा मॉडेल एपीएमसी अ‍ॅक्टसाठी ( Model APMC Act ) राज्यांना सूट दिली होती. मात्र मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमध्ये राज्यांना आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोणतेही अधिकार दिलेले नाहीत, असेही मलिक यांनी सांगितले. शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी कोणताही निर्णय एकट्याने घेतला नव्हता. निर्णय घेत असताना त्यांनी राज्याचे म्हणणे ऐकून घेतले तसेच केंद्राचा कायदा सरसकट न लादता राज्यांनाही त्यांच्यापद्धतीने बदल करण्याचे अधिकार दिले. मोदी सरकारने आणलेल्या नव्या कायद्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांना निष्प्रभ केले आहे. तसेच हमीभावाबद्दल कोणतेही आश्वासन दिलेले नाही, असे मलिक यांनी म्हटले आहे.

पवारांचे ते पत्र 165 पानांचे, पण दोनच पाने व्हायरल
भाजपकडून आता शरद पवार यांच्या ज्या पत्राचा उल्लेख केला आहे. ते पत्र 165 पानांचे आहे. मात्र जाणीवपूर्वक त्यातील दोनच पाने व्हायरल केली जात असून, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. पवार यांनी राज्यांना लिहिलेले पत्र हे सूचक होते, ते निर्देश नव्हते. एपीएमसीचे अधिकार केंद्राकडे घेण्यास शरद पवार कधीही तयार नव्हते, अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली आहे.