आता देशातील जनता २०१९ मध्ये त्यांच्या ‘मन की बात सांगेल : राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस पक्षाचे नेतृत्व हाती आल्यापासून प्रचार सभेत फक्त मोदी सरकारवर टीका असा घेऊन उतरलेल्या राहुल गांधी यांनी आज पुन्हा मोदी सरकार विरुद्ध नारा दिला. सुरुवातीला ‘बेटी पढाओ, बेटी बचाव’, असा मोदी सरकारचा नारा होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील मुलींचे रक्षण करण्यात अपयशी ठरले. आता ‘भाजपपासून मुलींना वाचवा’, असा नवा नारा देण्याची वेळ आल्याची टीका त्यांनी केली.

दिल्लीतील तालकटोरा मैदानात काँग्रेसतर्फे सोमवारी ‘संविधान बचाओ रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी बोलताना मोदी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. ते म्हणाले,”पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की,”वाल्मिकी समाजातील व्यक्ती जे काम करतात ते फक्त पोट भरण्यासाठी नसते. ते अध्यात्मासाठी असते. यातून मोदींची मानसिकता दिसून येते. त्यांच्या मनात दलितांसाठी जागाच नाही.”

”मोदींच्या मनात गरीब, महिला आणि दलितांसाठी जागा नाही. देशात दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. या देशाचे संविधानच महिला, दलित आणि गरीबांचे रक्षण करणार. देशाला संविधान काँग्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, आयआयटी, आयआयएम आणि निवडणूक आयोगसारख्या संस्था या संविधानामुळेच मिळाल्या आहेत. संविधानाशिवाय काहीच शक्य झाले नसते. सर्वोच्च आणि उच्च न्यायालय हा संविधानाचा भक्कम पाया आहे. जनता न्यायाधीशांकडे न्याय मागते. पण आता देशातील न्यायाधीश जनतेकडे न्याय माागू लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाची गळचेपी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुलींवर बलात्कार होतात. उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपा आमदार आहे. पण मोदी त्यावर काहीच बोलत नाही. पूर्वी सरकारचा नारा होता की, ”बेची पढाओ, बेटी बचाव”. पण आता भाजपपासून मुलींना वाचवा, असा नारा देण्याची वेळ आली, असे त्यांनी नमूद केले. आता देशातील जनता २०१९ मध्ये त्यांच्या ‘मन की बात सांगेल’, असे सांगत त्यांनी आगामी निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल, असा दावाही केला.