शरद पवार यांच्या मातोश्री भेटीवरून ‘या’ भाजप नेत्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांच्या मातोश्री भेटीवरून सणसणीत टोला लगावला आहे. राष्ट्रवदीचे अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ नेते असूनही त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जावं लागतं, असं आमदार शेलार यांनी म्हटलं आहे.

भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सणसणीत टोला लगावताना म्हटले आहे की, कुणाला किती वेळा, कुठे भेटावे ? हा विषय त्याचा असला तरी… आपण ज्या व्यक्तीला वारंवार बोलावून घेतो किंवा यायला लावतो. त्या व्यक्तीचे ज्येष्ठत्व, कर्तुत्व, सामाजिक स्थान आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी याचे भान ठेवावेच लागते ! इथे याबाबत ‘आनंदीआनंदच’ आहे ! अशा शब्दात शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दुसरीकडे, यूजीसीने घेतलेल्या निर्णया संदर्भात आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आशिष शेलार म्हणाले, राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्याना नापास करणार होते ? सुदैवाने ते आता बचावले. आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे जो विद्यार्थ्याना गेले तीन महिने मनस्ताप झाला. त्यामुळे विद्यार्थी भयभीत झाले आहेत. त्यांना संभ्रमातून बाहेर काढा. आता तरी सु-सूत्रे योग्य नियोजन करा, असा सल्ला आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.