‘जो पर्यंत पक्षांचा एकमेकांवर विश्वास आहे तोपर्यंत महाराष्ट्रातील सरकार राहील’, अमित शहांचा हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सरकारवर निशाणा साधताना एक शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रातल्या तीनही पक्षांचा एकमेकांवर विश्वास आहे तोपर्यंत सरकार राहील. एखाद्या पक्षाचा विश्वास नसले तर त्याला आम्ही काय करू शकतो, असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील कोरोनाची स्थिती आणि केंद्र सरकार करत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवही निशाणा साधला. पण त्याचवेळी आम्ही सरकार खाली खेचण्याचा प्रयत्न करणार नाही. नारायण राणेंना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारला सहकार्य करतो, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

फडणवीसांनी देखील केलं होतं भाष्य
काँग्रेसचे नेते एक बोलतात तर राष्ट्रवादीचे नेते दुसरंच बोलतात. त्यामुळे सरकारमध्ये समन्वय दिसत नाही. शरद पवार यांनी जे म्हटलं की भाजपकडून सरकार स्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर आमचं म्हणणं आहे की आम्हाला सरकार स्थापन करण्याची कोणतीही घाई नाही. हे सरकार त्यांच्या अंतर्विरोधातून कोसळणार आहे. आम्हाला सरकारला घालवयाचं नाही तर जागं करायचं आहे, असे फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.