मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सवानिमित्त चाकमान्यांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली होती. नुकतीच एसटी गाड्या सोडण्याचीही मंजूरी दिल्यानंतर आता रेल्वेही कोकणातील चाकरमान्यांसाठी धावणार आहे. मात्र, राज्य सरकारनं चाकमान्यांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात येणाऱ्या ट्रेनच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच कोकणी माणसावर कोणता आणि कसला राग काढला ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आहे. शेलार यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, रेल्वेच्या विशेष गाड्या तयार असतानाही ठाकरे सरकारने आमच्या कोकणातील चाकरमान्यांसाठी का ही सुविधा उपलब्ध करून दिली नाही ? प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकार यावेळी का हाल-हाल केले ? ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर कोणता आणि कसला हा राग काढला ?, असे प्रश्न शेलार यांनी केले आहेत.
काय आहे प्रकरण ?
रेल्वेच्या विशेष गाड्या तयार असतानाही ठाकरे सरकारने आमच्या कोकणातील चाकरमान्यांसाठी का ही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही?
प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकारने यावेळी का हाल-हाल केले?
ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर
कुठला आणि कसला हा राग काढला?— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 11, 2020
रेल्वेने विशेष तयारीही केली होती. वेळापत्रकाप्रमाणे रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई, सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस या स्थानकांपासून सावंतवाडीपर्यंत रेल्वे सेवेचं नियोजन केलं होतं. तसेच हे वेळापत्रक शुक्रवारी रेल्वे बोर्डालाही पाठवण्यात आले होते. गणेशोत्सवासाठी 190 विशेष रेल्वेगाड्यांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने हा निर्णय तूर्तास स्थगित केला.
सोमवारी आम्हाला याबाबत तोंडी माहिती देण्यात आली. मात्र, आम्ही लेखी स्वरुपात तो देण्यास सांगितले असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर कोकणात विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु आम्ही राज्य सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहोत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.