भाजपला बेइमान म्हणणार्‍या शिवसेनेला आशिष शेलार यांनी विचारले 7 प्रश्न

पोलीसनामा ऑनलाइन – ‘बात निकलेगी तो दूर तलक जायेगी’ असे म्हणत भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिला सुरक्षा दिल्याबाबत केंद्र सरकार आणि भाजपवर ‘सामाना’तून टीका करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेलार यांनी शिवसेनेच्या जुन्या भूमिकांचे दाखले देत काही प्रश्न विचारले आहेत.

काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबई व मुंबई पोलिसांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगना यांच्यात वाद निर्माण झाले होते. या वादात भाजपने कंगनाची बाजू घेत तिला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवली. त्याच अनुषंगाने ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करत, ‘राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठींबा देणे ही मातीशी बेईमानीच आहे, असे म्हटलं आहे. महाराष्ट्रातील बेईमानांच्या पाठीशी जे उभे राहत आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची ११ कोटी जनताही माफ करणार नाही. ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहली जातील,’ असं सुद्धा ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे. त्यावरुन शेलार यांनी या टीकेचा समाचार घेत शिवसेनेला काही प्रश्न विचारले आहेत.

>> कर्तबगार मुंबई पोलिसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत तुम्ही ‘बिर्याणी’ खाताय ना ?

>> याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री करुन दाखवले ना ?

>> भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गॅंगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना ? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना ?

>> गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेह्क प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना ?

>> मुंबई साखळी बॉंम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहीमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसली होती का ?

>> रस्त्यांवरच्या खड्ड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरात आणि कंगना राणावतच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना ?

>> बेईमानी, तळतळात हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना ?