भाजप नेत्याची राज्य सरकारवर सडकून टीका, म्हणाले – ‘महाविकास आघाडीला राजकारणाचा महारोग जडलाय, केवळ त्यावरच लक्ष’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशावेळी 12 आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या काळात कोणत्याही निवडणुकीच काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार जबाबदार धरता. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची आठवण कशी येते? महाविकास आघाडी सरकारचे केवळ राजकारणावर लक्ष असून त्यांना राजकारणाचा महारोग जडल्याची जबरी टीका भाजपा नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.

भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना शेलार बोलत होते. यावेळी शेलार यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेचाही खरपूस समाचार घेतला. भूत आणि भूताटकी ही नेमक कसली वक्तव्य आहेत? रोज नुसत 12-12 ची टिमकी वाजवली जात आहे. तुमचे काय 12 वाजलेत का? भुतान जर फाइल पळवल्याचे तुमच म्हणण असेल तर मी सांगू इच्छितो की भाजप काहीही आज करत नाही,पण भाजपन जर एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला खूप भारी पडेल हे लक्षात घ्यावे, अशा शब्दात जोरदार टोलाही शेलार यांनी राऊतांना लगावला आहे. दरम्यान अखिल भारतीय नाविक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली येलो गेट पोलीस ठाण्यात जाऊन एफकाँन्सचे संचालक मंडळ अन् शापूरजी पालनजी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी तक्रार त्यांनी केली. या प्रकरणात शापुरजी पालनजी यांच्या संचालकाना वाचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील कुठला मंत्री त्यासाठी प्रयत्न करीत आहे? असा सवालही शेलार यांनी केला. या प्रकरणी कंपनीच्या अध्यक्षांवर का वर गुन्हा नाही. जो हजर नाही, आपली बाजू मांडू शकत नाही अशा कॅप्टनवर गुन्हा दखल केला गेला. हा डाव कुठल्या मजल्यावर शिजला हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असा आरोप त्यांनी केला आहे.