‘शिवसेनेचा गल्लीत नुसताच गोंधळ अन् दिल्लीत सावळागोंधळ’ : भाजप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळागोंधळ अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे असं म्हणत भाजपनं शिवसेनेवर टीका केली आहे. केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी विधेयकावरून लोकसभा व राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर भाजपनं निशाणा साधला आहे.

कृषी क्षेत्रात अनेक सुधारणा घडवण्याचा दावा करत केंद्र सरकारनं आणलेली तीन कृषी विधेयकं संसदेच्या दोन्ही सभागृहात नुकतीच मजूर करण्यात आली. या विधेयकांना विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध झाला. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी थेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळं विरोधकांनाही बळ मिळालं होतं. भाजपपासून दुरावलेली शिवसेना यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेनं लोकसभेत कृषी विधेयकाला पाठींबा दिला. मात्र राज्यसभेत शिवसेनेच्या सदस्यांनी विरोधात भाषण करून सभात्याग केला. शिवसेनेच्या परस्परविरोधी भूमिकेवर भाजपनं टीका केली आहे.

भाजपचे आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ते म्हणतात, “नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) वेळी देखील शिवसेनेनं अशीच भूमिका घेतली होती. लोकसभेत सीएएचं समर्थन केलं होतं आणि यु टर्न घेत राज्यसभेत विरोध केला होता. कृषी विधेयकाच्या बाबतीतही हेच झालं आहे. महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत सेम टू शेम सुरू आहे.” असा टोला त्यांनी लगावला आहे. मुद्दाम शेम हा शब्द वापरत त्यांनी शिवसेनेचा निषेध केला आहे.