‘शरद पवारांची बार मालकांसाठीची कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला, शेतकऱ्यांसाठीही पत्राची अपेक्षा’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच आर्थिक व्यवहारांना खिळ बसली आहे. हॉटेल व्यावसायिक आणि बार चालकांनाही याची झळ बसली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. शरद पवारांची बार मालकांसाठी कळकळ पाहून कंठ दाटून आला, शेतकऱ्यांसाठीही अशाच पत्राची अपेक्षा म्हणत भातखळकर यांनी टीकास्त्र सोडल आहे.

शरद पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. 100 कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे, हे मी नमूद करू इच्छितो, अशी टीका भातखळकरांनी ट्विटमधून केली आहे. शरद पवार साहेब हॉस्पिटलमधून सकुशल आल्याबद्दल आपले अभिनंदन. प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे. बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला, तर थोड तिथेही लक्ष द्या, मराठा समाज मोठ्या आशेने आपल्याकडे पाहतोय, असे भातखळकर यांनी दुस-या ट्विटमध्ये म्हटले आहे.