पोलिसनाम ऑनलाईन टीम – राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोनाशी लढा देत आहे, त्याला यशही मिळत आहे. तरीही भाजपचे नेते सतत राज्यापालांना भेटून, कोरोना नियंत्रित ठेवण्यात सरकार कसे अपयशी ठरले आहे, अशी टीका करून महाराष्ट्राला बदनाम करीत आहेत, असा आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला होता. यावरून भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. कार्यक्षमतेमुळे राज्याला कोरोना क्रमवारीत प्रथम क्रमांकावर नेणारे आता विरोधकांवर खापर फोडतायत, असे म्हणत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे.
'कार्यक्षमते'मुळे राज्याला करोना क्रमवारीत एक नंबर वर नेणारे आता विरोधकांवर खापर फोडतायत.
संकटाचा मुकाबला करण्याची धमक नाही, लोकांच्या वेदना समजण्याइतपत संवेदनशीलता नाही, झेपत नाही हे कबूल करण्याचा प्रमाणिकपणा नाही, मात्र विरोधकांना दोष देण्याचा निलाजरेपणा मात्र पुरेपूर आहे. pic.twitter.com/UvE11ciNMJ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 21, 2020
संकटाचा मुकाबला करण्याची धमक नाही. लोकांच्या वेदना समजण्याइतपत संवेदनशीलता नाही. झेपत नाही हे कबूल करण्याचा प्रमाणिकपणा नाही. मात्रा, विरोधकांना दोष देण्याचा निलाजरेपणा पुरेपूर आहे, असे म्हणत भातखळकरांनी जयंत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विटरवून हल्लाबोल केला.
राज्यपालांकडे सारखे जाऊन, त्यांना त्रास देण्यापेक्षा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नाला पाठिंबा द्या, या लढाईत प्रत्यक्ष सहभागी व्हा, असा सल्लाही जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, मृत्यू पावणार्या व्यक्तींची संख्याही चिंताजनक आहे, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर आहे, या सर्व आघाडयांवर राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने केला आहे. सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.