…तर एकट्याने लढा ; चंद्रकांत पाटलांचं सत्ताधाऱ्यांना ‘आव्हान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – १ डिसेंबरला पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीचे जवळपास सर्व निकाल हाती आले आहेत. त्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पुणे व नागपूर हे बालेकिल्ले भाजपनं गमावले आहेत. तिथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.

भाजपच्या या पराभवाला तीन पक्षाची एकजूट कारणीभूत आहे. पुण्यात मतं खाणारा तिसरा ताकदीचा उमेदवार नसल्यामुळं भाजपला फटका बसला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालांमध्ये आश्चर्यकारक काहीही नाही. तिघे-तिघे मिळून एकट्याशी लढल्यानंतर यापेक्षा वेगळं चित्र दिसणार नव्हतं. तरीही आम्ही जिद्दीने लढलो. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकेकट्यानं लढावं. पण त्यांच्यात ती हिंमत नाही,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, शिवसेनेनं या निकालांतून बोध घ्यायला हवा, असं त्यांनी म्हटलंय. निकालावर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेनेला सावध केलं आहे. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदानाचे उदाहरण दिले. पुणे, मराठवाडा पदवीधरची जागा राष्ट्रवादीनं जिंकली. शिवसेनेनं अमरावतीची जागा गमावली. यात फायदा राष्ट्रवादीचा झाला. अमरावती शिक्षक मतदारसंघ अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीकडे राहणार आहे. कारण, तिथं पहिल्या क्रमांकावर असलेले उमेदवार अनिल देशमुख यांचे मेहुणा आहेत. ते राष्ट्रवादीतच जातील काँग्रेस, राष्ट्रवादी आपली संघटना वाढवतेय. शिवसेनेचं मात्र खच्चीकरण होतंय. शिवसेनेला चुचकारण्याचा किंवा सरकार बनविण्याशी माझ्या या वक्तव्याचा काही संबंध नाही. केवळ जुन्या प्रेमातून सांगतोय. काँग्रेसने नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक मतदारसंघ जिंकला. यात शिवसेनेला काय मिळालं ? असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे.